शिर्डी मतदारसंघांमध्ये गेली अनेक वर्षे एकहाती सत्ता असूनही विकास पूर्णपणे रखडला आहे. येथील दहशतीचे वातावरण संपविण्याबरोबर स्वातंत्र्य, बंधुभाव व निर्मळ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असून दृष्ट प्रवृत्ती रोखण्यासाठीच प्रभावतीताई घोगरे यांची उमेदवारी असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले आहे.
कोल्हार बुद्रुक येथे भगवती माता मंदिराच्या प्रांगणात प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार प्रभावती घोगरे, करण ससाने ,सचिन कोते, रिपाईचे नेते बाळासाहेब गायकवाड, पंकज लोंढे, किरण कडू ,सचिन चौगुले, राजेंद्र अग्रवाल, संजय शिंदे, लताताई डांगे, सोमनाथ गोरे, शितल लहारे ,सुधीर म्हस्के, विजय दंडवते, राजेंद्र निर्मळ यांसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. थोरात पुढे म्हणाले की, या मतदारसंघात खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्षपद अशी अनेक वर्ष सत्ता असूनही विकास कामे रखडली आहेत. गचक्यांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेला नगर-मनमाड महामार्ग यांना दुरुस्त करता आला नाही. साठ वर्षात एमआयडीसीबद्दल काहीच बोलले नाही .निवडणूक आली म्हणून एमआयडीसीच्या गप्पा सुरू झाल्या आहेत. या परिसरातील वातावरण कायमच दहशतीखाली असते. ही दहशत मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने प्रभावतीताई घोगरे यांना उमेदवारी दिली आहे.



गणेश कारखान्याची परिस्थिती अतिशय वाईट करून ठेवली होती. परंतु सभासदांनी कारखाना आमच्या ताब्यात दिल्यानंतर अतिशय सुंदरपणे कारखाना चालवला .शेतकऱ्यांचे पेमेंट, कामगारांचे पगार सर्व दिले. म्हणून गणेश परिसरात दिवाळी आनंदाची गेली.
मी महसूलमंत्री असताना आमदार ससाणे यांना बरोबर घेऊन श्रीरामपूरचा खंडकरी प्रश्न मार्गी लावला .त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व खंडकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले गेले. निळवंडे धरणाचे काम करत असताना धरणग्रस्तांसाठी प्रसंगी स्वतःची जमीन दिली .परंतु येथील नेत्यांनी कायम धरणाच्या कामात अडचणी निर्माण करण्याचे काम केले. हे महसूल मंत्री असताना सध्याचे वाळू धोरण पूर्णपणे फसले आहे. ग्रामीण भागात लोकांना घरे बांधण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा प्रश्न मी अनेक वेळा विधानसभेत विचारला तर त्याला उत्तरही त्यांनी दिले नाही, आता आपल्याला बदल घडवायचा आहे व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावतीताई घोगरे यांना जनतेमधून मोठा प्रतिसाद मिळत असून जनता दडपशाही खाली असली तरी मोठे मताधिक्य घोगरे यांना मिळणार आहे, सर्वांनी आपसातील मतभेद विसरून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकजुटीने काम करा आम्ही पाठीशी आहोत असे ते बाळासाहेब थोरात म्हणाले.
प्रभावती घोगरे म्हणाल्या की, माझे वडील राजकारणात असल्यामुळे मला राजकारणाचा वारसा आहे .शिर्डी मतदारसंघाची दहशत संपवण्यासाठी मी शपथ घेतली आहे .मला उमेदवारी मिळू नये म्हणून अनेक प्रयत्न केले गेले परंतु आमदार बाळासाहेब थोरात हे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याने मला उमेदवारी मिळाली .शिर्डी मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे प्रलंबित आहे ते पूर्ण करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. गेली 35 वर्ष तुम्ही जे केले नाही ते मी पाच वर्षात करणार आहे आणि शिर्डी मतदार संघाला भयमुक्त करण्याचा संकल्प मी केला आहे.
याप्रसंगी बाळासाहेब गायकवाड, करण ससाने , सुरेंद्र खर्डे, सचिन चौगुले,आदींसह विविध नेत्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कोल्हार व परिसरातील नागरिक युवक महिला व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.