50 लाख रुपये निधी खर्चून अद्यावत उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद का ? – आमदार सत्यजीत तांबे यांचा परखड सवाल

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे वैभवशाली व सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर शहरांमध्ये 50 लाख रुपये निधीतून अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा व कंट्रोल रूम उभारण्यात आली. ही सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही सीसीटीव्ही यंत्रणा बंद का असा परखड सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे.

अहिल्यानगर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरातील सुरक्षिततेच्या मुद्द्यावर परखड सवाल केला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे व्यापारी व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर आहे. येथे नागरिकांची राहण्यासाठी पहिली पसंती असून लाखो नागरिकांची शहरांमध्ये दररोज वर्दळ असते. महिलांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्कालीन नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकारातून नगरपरिषदेच्या 50 लाख रुपये निधीतून अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आलेली आहे.

याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेची आधुनिक कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. नगरपालिकेने सुरू करून दिलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची हस्तांतर पोलीस प्रशासनाकडे केलेले आहे. या सर्व सीसीटीव्ही यंत्रणा देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सुद्धा पोलीस प्रशासनाचीच आहे. मात्र पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मागील अनेक दिवसांपासून काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने शहरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे .याचबरोबर महिलांची व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शांत व सुसंस्कृत संगमनेर शहरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

याबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी परखड सवाल विचारताना म्हटले आहे , जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नाही अशी हायटेक कंट्रोल रूम संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये उभारण्यात आली आहे आहे. 50 लाख रुपये निधी खर्चातून उभारण्यात आलेल्या अद्यावत सीसीटीव्ही व कंट्रोल रूम याची देखभाल दुरुस्ती का होत नाही. प्रशासनाची उदासीनता की अजून कोणाचा दबाव आहे असे विचारताना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर पोलीस प्रशासनाने याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *