पर्यावरण संवर्धन हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य – मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

हवामान आणि ऋतूंमधील बदल याचबरोबर वाढती उष्णता आणि ग्लोबल वार्मिंगची समस्या टाळण्याकरता वृक्षारोपण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून ते प्रत्येकाने मूलभूत कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दंडकारण्य अभियानांतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये 201 आंबा वृक्षांचे तसेच तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी मा.मंत्री बाळासाहेब थोरात, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, रणजितसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड,विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे,अरुण वाकचौरे, योगेश भालेराव,अंकुश ताजने, दिलीप नागरे,सौ.लता बाबासाहेब गायकर,सौ.सुंदराबाई रावसाहेब दुबे, आनंद वर्पे, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब फापाळे, किरण कानवडे, शिवाजी खुळे, रामनाथ शिंदे आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी कारखाना परिसरामध्ये व तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 2006 मध्ये दंडकारण्य अभियान सुरू केले. या अंतर्गत तालुक्यातील उघड्या बोडक्या डोंगरांवर वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. पर्यावरण जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहेत.
कोरोना संकटामध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि अनन्य साधारण महत्व संपूर्ण जगाने अनुभवले. वृक्ष हे आपल्याला 24 तास मोफत ऑक्सिजन देत असतात. त्यांचे संवर्धन हे केलेच पाहिजे.याचबरोबर प्लॅस्टिकचा वापर कमी करणे हेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.


तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, संगमनेर तालुक्याप्रमाणे कृषीप्रधान भारत देशामध्ये पर्यावरण संवर्धन ही लोक चळवळ उभी राहिली पाहिजे. दंडकारण्य अभियान ही संगमनेर तालुक्याची ओळख बनली आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये प्रत्येकाने या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेऊन कमीत कमी दोन वृक्ष रोपण व त्याचे संगोपन करावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी केले .तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • रिमझिम पावसात पर्यावरण गीते
    5 जून निमित्त कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपण करताना रिमझिम पाऊस सुरू झाला यावेळी प्रा बाबा खरात यांनी विविध पर्यावरण संवर्धनाची गीते गायली. झाडे लावा ,झाडे जगवा, पाणी आडवा, देश वाचवा या घोषणांनी परिसर दुमदुमला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *