थ्री इडियट चित्रपटातील खऱ्या शिक्षणतज्ञ वांगडू यांची माजी शिक्षणमंत्री थोरात यांनी लडाखमध्ये जाऊन घेतली भेट, कौशल्य आधारित शिक्षण गरजेचे – बाळासाहेब थोरात

आमिर खान यांचा गाजलेला थ्री इडियट चित्रपट हा तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटातील खरेखुरे शिक्षण तज्ञ असलेले फुंगसुक वांगडू यांनी काश्मीर खोऱ्यातील दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित ज्ञान देण्याची शाळा सुरू केली असून जगभरात कौतुकास्पद ठरलेल्या या पर्यावरणप्रेमी व शिक्षणतज्ञाची महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली असून आगामी पिढीला कौशल्य आधारित ज्ञान गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

काश्मीर खोऱ्यातील लडाखच्या दुर्गम प्रदेशात अभियंते तथा थोर शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक तथा फुंगसुक वांगडू यांची महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी समवेत अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख उपस्थित होत्या.
शिक्षणातील करियर हे आपल्या आवडीनुसार करावे किंवा तरुणांना आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मोकळी संधी द्यावी यासाठी असलेला थ्री इडियट चित्रपट हा अत्यंत लोकप्रिय ठरला होता. यामध्ये आमिर खान यांनी पारंपारिक घोगमपट्टी असलेल्या शिक्षण पद्धती मध्ये बदल करून आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर कसे करता येईल असा चांगला संदेश दिला होता आणि त्यामुळे हा चित्रपट तरुणांसह पालकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला होता.


या चित्रपटामध्ये काश्मीरच्या लडाख खोऱ्यामध्ये कौशल्य आधारित स्कूल सुरू करणारे पर्यावरण प्रेमी तथा थोर शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक तथा फुंगसुख वांगडू यांची भूमिका आमिर खान यांनी साकारली होती. यानंतर या शिक्षण तज्ञाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.
लडाख मध्ये या संस्थेला भेट दिल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्य आधारित शिक्षण देण्यावर आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्यावर शिक्षणतज्ञ वांगचुक यांनी भर दिला आहे. या ठिकाणाहून अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले आहे. याचबरोबर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशांमध्ये वांगचुक यांनी मोठी शैक्षणिक क्रांती घडवली असून त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाशी व आनंददायी शिक्षणाची जोडले आहे. आइस स्टूपा या प्रकल्पाने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नवा मार्ग दाखवला असून त्यांच्या नावीन्यपूर्ण कामामुळे ते तरुण पिढीचे खरे हिरो ठरले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून पूर्ण क्षमतेने योगदान दिल्यास त्यांना नक्की यश मिळणार असून कौशल्य आधारित शिक्षण पद्धती अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

तर शास्त्रज्ञ सोनम वांगचुक म्हणाले की, महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांनी शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्याबरोबर अत्यंत कौतुकास्पद विविध उपक्रम राबवले आहेत. कृषिमंत्री आणि शिक्षण मंत्री असा योगायोग बाळासाहेब थोरात यांच्यामुळे महाराष्ट्राला मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी शिक्षक प्रणाली त्यांनी राज्यांमध्ये सुरू केली. शिक्षणाबरोबर तांत्रिक शिक्षण शिक्षणामुळे संपूर्ण देशांमध्ये महाराष्ट्रातील अभियंते कार्यरत आहेत. याचबरोबर परदेशातही अनेक अभियंते असून पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संपूर्ण मुभा दिली पाहिजे. याचबरोबर त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

फुंगसुख वांगडू तथा सोनम वांगचुक यांची भेट ही संस्मरणीय असून त्यांनी दिलेल्या सूचनांचे जास्तीत जास्त पालन करताना अमृतवाहिनी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अधिक काम करू असं शरयूताई देशमुख म्हणाल्या.
या भेटीनंतर माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक यांनी स्वागत करून संपूर्ण संस्था व लडाखचा परिसराची पाहणी करून माहिती दिली. तर सौ.शरयताई देशमुख यांनी त्यांना संगमनेरला येण्याचे आमंत्रण दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *