छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर शत्रूंनी अन्याय अत्याचार केले. मात्र त्यांनी स्वराज्य मिळविण्यासाठी शत्रूशी दोन हात करत आपल्या प्राणाची आहुती दिली होती. हा इतिहास कुणालाही विसरून चालणार नाही, तसेच त्यांना कोणी एका बंधनात अडकून ठेवू शकत नाही कारण त्यांचा त्याग आणि बलिदान कोणीही कधीच विसरू शकणार नाही, तर आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार आचरणात आणून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहावे असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी तरुण पिढीला दिला.

संगमनेर शहरातील नवीन नगर रोडवर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते, या वेळी व्यासपीठावर देहू येथील राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज निरंजन महाराज मोरे, गिर्यारोहक श्रविका म्हात्रे, ज्ञानेश्वर पठाडे, ओंकार पांडव, शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, रेखा गलांडे, दिपाली वाव्हळ, राहुल भोईर, शशांक नमन, छत्रपती छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय चिलप, उपाध्यक्ष विश्वेश मोहरीक,र सिद्धेश पवार, कार्याध्यक्ष सुरज पवार, खजिनदार अजय धारणकर, विनायक वडतले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
धर्माच्या रक्षणासाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत आहे.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे औरंगजेबाचा बंदोबस्त केला होता त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा बंदोबस्त केला आहे. जर आमच्या कोणी नादी लागले तर त्यांचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय सोडणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय.
छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने संगमनेर बसस्थानकापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत आमदार अमोल खताळ यांची ढोलताशाच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली .यावेळी आमदार अमोल खताळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांची महाआरती करून अभिवादन केलं गेलं. त्यानंतर जन्मोत्सवानिमित्त महिलांबरोबर आमदार अमोल खताळ यांना पाळण्याचा दोर ओढण्याचा बहुमान मिळाला.